किशोरचा बाप करमाळ्याचा आमदार नामदेवराव जगताप. किशोरच्या लहान भावाच्या बाप मराठवाड्यातला धारूरकर नावाचा वयस्कर माणूस. आणि आता किशोरची आई सोनपेठमधला कृष्णराव वडकर या सावकाराला 'मालक' करून बसलेली. अशा बाईला आई तरी कसं म्हणायचं? पण कोल्हाट्याच्या बायकांचं जीवन असंच असतं. विशेषतः गावोगावच्या पार्टीत नाचणाऱ्या बायकांचं.
अशाच एका थिएटरबाहेर काही नाचणारणी ताडपत्री तर काही कापडाचा आडोसा करून आंघोळ करत होत्या.
'आयला, हिचं अंग लई गोरं हाय. किती पैसे घेईल रं?' पोरं फटीतून बायांची उघडी अंगं बघत आणि त्यांच्या बरोबर झोपायला किती पैसे लागतील याचा अंदाज काढत.
वेगवेगळ्या पार्टीत नाचणाऱ्या कोल्हाटणींना समाज 'भोगवस्तू' म्हणूनच पाहत होता.
'कोंडिबा, तुला काय पाह्यजे ते सांग. पण तुझी पोरगी माझ्याकडे ठेव.' आमदार जगतापने किशोरच्या आजोबाला प्रस्ताव दिला. पैशांसाठी आईला, बहिणीला किंवा मुलीला विकणं कोल्हाटी पुरुषाला काही नवीन नव्हतं. सौदा ठरला आणि आमदार जगतापने शांताचा चिरा उतरवला.
चिरा उतरवणं म्हणजे नातलगांनी घेतलेल्या पैशांच्या बदल्यात पदर आलेल्या तरूण कोल्हाटणीने आपलं कौमार्य एखाद्या पुरूषाला बहाल करणं.
कोल्हाटी समाजात चिरा म्हणजे लग्नच. मुलीला नवरीसारखं सजवायचं, तिला देवाची पूजा करायला लावायचं, तिने नातलगांच्या पाया पडायचं, गळ्यात मंगळसूत्र घालायचं आणि तिने 'तिला विकत घेतलेल्या मालका'बरोबर पहिली रात्र साजरी करायची.
हा मालक उबग येईपर्यंत कोल्हाटणीचा उपभोग घेतो आणि बदल्यात तिच्या कुटुंबाला पैसे देतो. किशोरचा जन्म झाल्यावर आमदाराचं मन भरलं आणि तो शांताला सोडून गेला.
आमदार जगताप सोडून गेल्यावर किशोरच्या आजोबाने शांतासाठी दुसरा मालक बघितला. इथेही तीच कथा. धारूरकर नावाचा हा वयस्कर दारूडा शांताच्या पदरात दुसरा मुलगा घालून मरून गेला.
शांताला तिसरा मालक बघणं आजोबाला परवडणार नव्हतं कारण त्याने शांताला नाचायला शिकवलेलं आणि ती त्याला पैसे कमावून देऊ शकत होती.
तसं पाहता शांताचं गाणं तिच्या नाचण्यापेक्षा चांगलं पण तिच्या गिऱ्हाईकांना तिच्या गोऱ्या रंगात, देखण्या रूपात आणि घाटदार शरीरात अधिक रस होता.
शांता पार्टीत नाचायला लागल्यापासून घरच्यांची सोय झाली. तिचा बाप, आई, तीन भाऊ घरात बसून आयते खाऊ लागले. शांताच्या बहिणीसुध्दा नाचकाम करायच्या.
शांतावर फिदा झालेले सोनपेठचे सावकार कृष्णराव वडकर तिच्या गाण्याला येऊन दौलतजादा करू लागले.
'हे कसलं आयुष्य? तू म्हातारी झाल्यावर कोण तुझा नाच बघणार? माझ्याबरोबर चल. मी तुझ्या नावावर जमीन करतो, तुला घर देतो, आयुष्यभर सांभाळतो...' सावकाराने शांताला भुलवलं आणि ती धाकट्या मुलाला घेऊन सोनपेठला गेली.
शांता सावकाराला पती मानत असली, त्याची पूजा करत असली, त्याने ताटात ठेवलेले पाय धुवून ते पाणी पित असली तरी समाजाच्या दृष्टीने ती त्याची 'रखेल'च होती.
कोल्हाटी समाजातील पुरूषांनी आयाबहिणींची दलाली करून खाणं हीच रीत होती. कोल्हाटी समाजात बेढब व कुरूप मुलींची लग्न लावून त्यांना संसाराला लावत कारण त्या मुलींमध्ये पैसा कमावण्याचे गुण नसत.
शांतासारखी सोन्याची अंडी देणारी कोंबडी (किशोरची आई) वडकर सावकाराबरोबर निघून गेल्यावर किशोरचा आजोबा चिडला. एकदा या कोल्हांट्यानी सोनपेठला जाऊन शांताला परत आणण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही.
आता किशोर आजोबासाठी ओझं झाला आणि हा असला आजोबा नातवाला फुकट का खाऊ घालेल? किशोर आजोबा, आजी आणि मामांचा फुकटचा नोकर झाला. तो कधी सावत्र आजीची भाकर घेऊन रानात जाई तर कधी रात्री शेतावर झोपायला जाई. पण ही झाली पुरुषांची कामं. वेळ आल्यावर किशोर घरात झाडलोट करी, दळण दळायला जाई, अगदी स्वयंपाकही करी. आणि अशी वेळ रोज येई.
किशोरच्या बापाने त्याला स्वतःचं नाव दिलं नव्हतं. आईने धाकट्या भावाला बरोबर नेऊन किशोरला वाऱ्यावर सोडलं. आजोबा, आजी आणि मामा तर त्याला कुत्र्यासारखं बडवत व नोकरासारखं वागवत. मग ह्या किशोरला आपलं म्हणणारं होतं तरी कोण?
अशा परिस्थितीत वाढत असलेला किशोर मुंबईसारख्या शहरात एमबीबीएस करून डाॅक्टर होईल? आणि जरी तो डाॅक्टर झाला तरी तो प्रवास तितका सोपा असेल?
- विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे कोल्हाट्याचं पोर हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.